Breaking

Search this Blog

14 June 2013

UPSC & MPSC ESSAY WRITING(निबंध लेखन)

how to prepare for upsc essay
यूपीएससीची पूर्वपरीक्षा संपली. थोडय़ाच दिवसांत निकाल लागेल. जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील ते मुख्य परीक्षेसाठी निवडले जातील. त्यानंतर खरे तर परीक्षेचे आव्हान सुरू होईल, कारण मुख्य परीक्षेत उत्तम गुण मिळवून अंतिम निवडयादीत अव्वल क्रमांक प्राप्त करण्यासाठी एकेक मार्क महत्त्वाचा ठरतो. 
पूर्वपरीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते, तर मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक स्वरूपाची आहे. मुख्य परीक्षेत निबंधाचा एक स्वतंत्र पेपर असतो. २५० गुणांसाठी दिलेल्या चार किंवा पाच विषयांपकी कोणत्याही एका विषयावर तीन तासांत निबंध लिहावा लागतो. थोडक्यात, मुख्य परीक्षेच्या दृष्टीने निबंध हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
निबंध कसा लिहावा, त्याची तयारी कशी करावी, हे प्रश्न विद्यार्थ्यांना नेहमीच  भेडसावत असतात. निबंध लिहिणे ही एक कला आहे, एक कौशल्य आहे. मात्र, प्रयत्नपूर्वक ते आत्मसात करता येते.
मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययनाच्या प्रश्नपत्रिकेत, प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी शब्दमर्यादा दिलेली असते. मात्र निबंधाच्या पेपरसाठी शब्दमर्यादा सांगितलेली नसते. म्हणूनच नेमक्या किती शब्दांत निबंध लिहावा, हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. उत्तर साधे आहे. सामान्य अध्ययनाचा पेपर लिहिताना दोन गुणांसाठी आयोगाची २० शब्दांची मर्यादा आहे. म्हणजे लिहिण्यासाठी साधारणत: २५० गुणांसाठी दोन हजार ते अडीच हजार शब्दमर्यादा पाळणे आवश्यक आहे. अगदीच दीड हजार शब्दांहून कमी शब्दांचा निबंध लिहू नये. (अर्थात हा काही नियम नाही.)
निबंधात शैलीपेक्षा अभिव्यक्ती महत्त्वाची ठरते. आयोगाने आपल्या अधिसूचनेत असे नमूद केले आहे की, दिलेल्या विषयांपकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावा. सुसंगत व स्पष्टपणे निबंध लिहिणे अपेक्षित आहे. थेट व परिणामकारक अभिव्यक्तीला गुण दिले जातात. म्हणजेच उथळपणे लिहिलेल्या, कसेबसे दोन हजार शब्दांपर्यंत ओढूनताणून लिहिलेल्या निबंधाला गुण मिळणार नाहीत, हे नक्की. निबंध हा विचार मांडण्यासाठी लिहिला जातो. निबंधातील शब्दरचना शक्यतो सोपी असावी. दिलेल्या विषयांपकी तुम्हाला उमजलेला, तुम्ही ज्या विषयाची चांगली तयारी केली आहे किंवा तुमच्या ज्ञानशाखेशी संबंधित असा विषय निवडावा. विज्ञान शाखेशी संबंधित विद्यार्थ्यांनी विज्ञानासंबंधी एखाद्या विषयावर निबंध लिहिताना काळजी घ्यावी. त्या विषयाशी संबंधित विज्ञानातील जड संकल्पना, सूत्रे लिहू नयेत. तसेच आपल्या वैकल्पिक विषयाशी संबंधित एखाद्या विषयावर निबंध लिहिताना विशेष काळजी घ्यावी. 
निबंधाची तयारी कशी करावी?
या घटकाची तयारी करण्यासाठी आपण तयारी करणाऱ्यांचे दोन प्रकार असतात-
१) ज्यांना एक-दीड वर्षांनंतर परीक्षा द्यायची आहे, अशांसाठी दीर्घ मुदतीची तयारी (Long Term Preparation ) 
२) ज्यांना २०१३ ची मुख्य परीक्षा द्यायची आहे, त्यांच्यासाठी अल्पावधीतील तयारी( Short Term Preparation)
दीर्घ तयारी  (Long Term Preparation )
परीक्षेसाठी एक वर्ष किंवा दोन वर्षांचा अवधी असलेल्या उमेदवारांकडे तयारीसाठी मुबलक वेळ असतो. त्यांनी या घटकाच्या तयारीसाठी योग्य रणनीती तयार करावी. दररोज किमान दोन वृत्तपत्रांचे वाचन करावे. जर निबंध इंग्रजीमध्ये लिहिणार असाल तर आघाडीच्या काही इंग्रजी दैनिकांचे वाचन करावे. संपादकीय तसेच महत्त्वाचे लेख रोज वाचावेत. अवघड शब्द, म्हणी, वाक् प्रचार यांचा अर्थ समजून घ्यावा. इंग्रजीसाठी शब्दसंपदा जेवढी समृद्ध, तेवढे कोणत्याही विषयावर आपणास आपले मत ठामपणे मांडणे सोपे जाते. विविध विचारवंतांचे विचार, त्यांनी एखाद्या विषयावर मांडलेले मत, काही म्हणी, कविता यासंबंधीची टिपणे काढावीत. अभ्यासाव्यतिरिक्त इतर संबंधित विषयांवरील पुस्तकांचेही वाचन करावे. 
वेळोवेळी एखादा विषय घेऊन त्यावर निबंध लिहून पाहावा. शक्य झाल्यास तज्ज्ञ व्यक्तींकडून तो तपासून घ्यावा. असे केल्यास परीक्षेच्या वेळेस आपल्याला निबंध या घटकाची तयारी स्वतंत्रपणे करावी लागणार नाही.
२०१३ साठी मुख्य परीक्षा : तयारी 
निबंधाच्या पेपरसाठी तीन तासांचा अवधी असतो. म्हणजे १८० मिनिटे. पहिली १० मिनिटे निबंध वाचून विषय समजून घेण्यासाठी व शेवटची १० मिनिटे निबंध वाचून त्यातील बारीकसारीक चुका दुरुस्त करण्यासाठी ठेवल्यास हातात १६० मिनिटे उरतात. दोन हजार शब्दांत निबंध लिहिण्यास हा वेळ पुरेसा ठरतो. सर्वप्रथम कोणत्या विषयावर निबंध लिहिणार, ते निश्चित करा. विषय निश्चित झाल्यानंतर त्याबद्दल काय लिहिणार आहात, त्यात कोणते मुद्दे अपेक्षित आहेत यांची कच्ची मांडणी एका कागदावर करा. त्या मुद्दय़ांना लगेच क्रम देऊ नका. सुरुवातीला मुद्दे लिहून घ्या व नंतर त्यांना क्रम द्या.
एकदा कच्ची रूपरेषा निश्चित झाल्यानंतर त्याची मांडणी (अभिव्यक्ती ) कशी करू शकतो, याचा विचार करावा. आपल्या विचारांची मांडणी अशा प्रकारे करावी की, ज्यात आपण देत असलेली उदाहरणे, करत असलेला युक्तिवाद, देत असलेली माहिती, दाखले, दृष्टांत या सर्वाची एकसंध बांधणी होऊन निबंध तयार व्हावा. निबंध प्रभावी करण्यासाठी उदाहरणे, कोटेशन्स, काही विचारवंतांची मते सहजसोप्या भाषेत लिहावीत. लांबलचक पल्लेदार वाक्ये, अवघड शब्दप्रयोग शक्यतो टाळावेत. कोणताही विचार लिहिताना मुद्दाम ओढूनताणून केलेला नसावा, नाहीतर निबंध हा निबंध राहणार नाही. लिहिताना आपली शैली सहज असावी. एखाद्या विचारवंताचे एखादे वाक्य लिहिताना ते कुणाचे आहे, यात गल्लत करू नका. उदा. जर वाक्य अब्राहम लिंकनचे असेल आणि ते वाक्य जॉर्ज वॉिशग्टन यांचे आहे, असे लिहिल्यास विपरित परिणाम होऊन मार्कस् कमी होतील. एखादे कोटेशन तुम्हाला नक्की माहीत असेल तरच लिहावे. माहीत नसेल किंवा तुम्ही त्याबाबत जरा जरी साशंक असाल तर लिहू नका. वाक्यातील शब्दांची अदलाबदल करू नका. उदा. माओचे एक वाक्य आहे-Power Flows from the barrel of gun.  हे वाक्य Barrel of the gun contains Power 
निबंधात आपले विचार (Content), मांडणी  (Composition ) व लिहिण्याची योग्य शैली ( Style) याचा सम्यक मेळ साधला गेला तर निबंध प्रभावी ठरतो.
निबंध लिहिताना होणाऱ्या चुका 
मोठे उत्तर लिहिताना सुरुवात अगदी अचूक माहीत असलेल्या वाक्याने करावी. त्यानंतर महत्त्वाचे मुद्दे क्रमाने लिहावेत. नंतर प्रत्येक मुद्दा चार ते पाच ओळींत लिहिण्याचा प्रयत्न करावा. उत्तराचा शेवट समर्पक आणि लिहिलेल्या  सर्व मुद्दय़ांचा सारांश असलेला हवा.
पेपर तपासणारे परीक्षक देशातील वेगवेगळ्या विद्यापीठांतून आलेले तज्ज्ञ प्राध्यापक असतात. ते अनुभवी असतात, म्हणून वरवरचे मुद्दे मांडून, पानभर निबंध लिहून फसविण्याचा प्रयत्न करू नये.
निबंधाचा विषय निवडताना ज्याबाबत तुम्हांला थोडी माहिती आहे किंवा ज्या विषयातील आपले ज्ञान अल्प आहे, असे उदा. ' Do we need nuclear Power ?'(आपणास अणुऊर्जेची गरज आहे काय?) या विषयावर निबंध लिहिताना परीक्षार्थी सुरुवात पुढील मुद्दय़ांनी करतो- औष्णिक ऊर्जेचे तोटे, त्यामुळे किती व कसे प्रदूषण होते, भारताची वाढणारी लोकसंख्या, कोळशाचे कमी होत जाणारे साठे, अणुऊर्जा कशी स्वस्त पडते, त्यामुळे कमी प्रदूषण होते, जपान त्सुनामी इ. घटकांना स्पर्श करत सुमारे ५०० ते ६०० शब्द पूर्ण करताना त्याची दमछाक होते. मग तो पुन्हा नवीन मुद्दय़ांवर विचार करायला लागतो. नंतर लक्षात येते, अणुऊर्जा प्रकल्पांमुळे लोकांचे विस्थापनदेखील होते. मग तो महाराष्ट्राच्या संदर्भात लिहायला सुरुवात करतो आणि त्याचे अध्रे पान लिहून पूर्ण होते. तरीही त्याला अपेक्षित शब्दमर्यादा पार करायची असते. मग त्याला भूमी अधिग्रहण (Land Acquisition) चा मुद्दा आठवतो. मग तो या मुद्दयाशी संबंधित फायदे-तोटे लिहू लागतो आणि आणखी अर्धे पान भरते. लिहिता लिहिता त्याच्या लक्षात येते, आपल्याला भारत-अमेरिका नागरी अणुकराराबाबत लिहायला हवे. मग तो सीटीबीटी (CTBT), एनपीटी (NPT) याबाबतही लिहितो. नंतर संयुक्त राष्ट्र संघटनेतील कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्याच्या दृष्टीने भारताची दावेदारी किती योग्य आहे, याबाबत लिहायला सुरुवात करतो.. तीन तास उलटेपर्यंत तो त्यावर लिहीत राहतो. अशा रीतीने तो मूळ मुद्दय़ापासून भरकटत जातो. निबंधात सुसंगत विचारांची व्यवस्थित मांडणी नसते. 
अशा निबंधास २५० पकी ५० पेक्षाही कमी गुण मिळतात, तेव्हा त्याला चूक उमगते. मुख्य परीक्षेत इतर विषयांत चांगले गुण असूनही एकूण मार्कामध्ये यामुळे कमी पडल्याने मुलाखतीसाठी आपल्याला बोलावणे येत नाही. अनेक तज्ज्ञ प्राध्यापकांशी बोलल्यानंतर तसेच अनेक यशस्वी विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून निबंध लिहिताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी, हे निश्चित-
    सर्वप्रथम दिलेले विषय व्यवस्थित समजून घ्यावे. इंग्रजीत विषय समजला नसेल तर िहदीत वाचून, ज्या विषयावर आपली पकड आहे त्या विषयावर निबंध लिहावा.
    निबंध लिहिण्यास घाईने सुरुवात न करता त्यात आपण कोणते मुद्दे लिहिणार आहोत त्याची मांडणी करून कच्चा आराखडा तयार करावा.
    एकदा मुद्दे लिहिल्यानंतर त्यांना योग्य क्रम द्यावा.
    निबंधाला सुरुवात करताना सुरुवात आकर्षक, विषयाशी निगडित व विषयाची घट्ट पकड घेणारी असावी.
    उर्वरित निबंध वाचण्याचे परीक्षकाचे कुतूहल वाढण्यासारखी सुरुवात  असावी.
    ज्या विषयावर आपण निबंध लिहीत आहोत, तो विषय सोडून इतर अवास्तव माहिती लिहू नये.
    वस्तुनिष्ठ माहिती (डाटा) याला निबंधात फारसे महत्त्व नाही. तुम्ही लिहीत असलेल्या विषयात तुमचे किती ज्ञान आहे, विचारांची तुम्ही कशी मांडणी केली आहे, तो विषय सकारात्मक प्रकारे कशा शैलीत लिहिला आहे, यावरून निबंधाचे गुण ठरतात.
    विनाकारण सरकारी धोरणावर टीका करू नका. उदा.अमूक पदावरील व्यक्तीने अशी पावले उचलायला हवी होती वा असे निर्णय घ्यायला हवे होते. अशा प्रकारच्या लिखाणाने कमी गुण मिळू शकतात.
    कोणत्याही प्रश्नावर तुमचे मत लिहिताना ते वास्तवाला धरून असावे, ते अगदीच नाटय़मय असू नये.
    निबंधातील भाषा सोपी असावी. निबंधात एका मुद्दय़ाचा दुसऱ्याची मेळ असावा. त्यातून विचारांची ताíकक सुसंगती साधली जावी.
    निबंधाचा शेवट संपूर्ण निबंधाशी मिळताजुळता असावा. शक्यतो आपले स्वत:चे वैयक्तिक मत न देता निबंधाला अनुरूप असा शेवट करावा.
परीक्षा केंद्रात निबंध लिहिताना :
    पेपर हातात मिळाल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत वाचून पेपरमध्ये दिलेले विषय नीट समजून घ्यावेत.
    पुढील ४५ ते ५० मिनिटांत निबंधाचा कच्चा आराखडा, त्यात समाविष्ट करावयाचे मुद्दे, त्यांचा क्रम यांची मांडणी करून घ्यावी. उरलेल्या दीड ते पावणेदोन तासांत निबंध लिहावा, तर शेवटची १५ मिनिटे काही चुका दुरुस्त करण्यासाठी हातात ठेवावीत.
थोडक्यात सांगायचे तर निबंध हा घटक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अजूनही मुख्य परीक्षेसाठी सहा महिने उरले आहेत. निबंधलेखनाचा व्यवस्थित सराव करावा.
यू.पी.एस.सी.च्या संदर्भात काही व्यक्ती असे मत मांडतात की, निबंधासाठी विशेष तयारी करण्याची गरज नसते. सामान्य अध्ययनाच्या इतर घटकांचा अभ्यास करता करता त्याची तयारी होत असते. पण या परीक्षेत एकेका गुणाला असलेले महत्त्व लक्षात घेतले आणि संबंध देशात या परीक्षेसाठी होणारी स्पर्धा बघितली तर योग्य प्रकारे तयारी केलेली उत्तम!
परीक्षार्थीनी निबंधलेखनाची व्यवस्थित तयारी करावी. ठरावीक विषयांवर निबंध लिहून पाहावेत. ते तज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत. या परीक्षेत चांगल्या क्रमांकाने यशस्वी व्हायचे असेल तर अधिकाधिक सराव करणे श्रेयस्कर. 

मुख्य परीक्षेत जास्तीत जास्त गुणांनी यश मिळविण्यासाठी नियोजनपूर्ण अभ्यास, मुद्देसूद लिहिण्याचा सराव आणि तयारीत सातत्य आवश्यक ठरते.
गेल्या आठवडय़ात (२६ मे) रोजी संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवांकरिता पूर्वपरीक्षा पार पडली. या वर्षांपासून मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदललेला आहे व बदललेल्या अभ्यासक्रमानुसार होणारी मुख्य परीक्षा २०१३ ही पहिलीच परीक्षा असेल.
पूर्व परीक्षा देऊन आल्यानंतर अनेक विद्यार्थी मोठी चूक करतात ती म्हणजे पूर्वपरीक्षेचा निकाल येईपर्यंत मुख्य परीक्षेचा अभ्यास न करणे. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालो तरच मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्याचा त्यांचा मनसुबा असतो. मात्र त्यामुळे पूर्वपरीक्षा झाल्यानंतरचा महत्त्वाचा वेळ केवळ पूर्वपरीक्षेच्या निकालाची वाट पाहण्यात निघून जातो. अशाने पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उरलेल्या काळात मुख्य परीक्षेचा अभ्यास होणे कठीण बनते. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तर एवढय़ा कमी कालावधीत मुख्य परीक्षेचा अभ्यास पूर्ण होणे कठीण आहे.
म्हणूनच पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण होऊ की नाही, आपल्याला पूर्वपरीक्षेत किती मार्कस् मिळतील, इतर विद्यार्थ्यांना पेपर कसा गेला आहे इ. चर्चा करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी लगेचच मुख्य परीक्षेच्या तयारीला सुरुवात करायला हवी. जे विद्यार्थी २०१४ मध्ये पूर्व परीक्षा देणार आहेत त्यांनीदेखील आतापासून मुख्य परीक्षेच्या तयारीला लागावे. नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सामान्य अध्ययनाचा आवाका इतका वाढला आहे की, त्याचा अभ्यास केल्यानंतर पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययनाच्या पेपर १ चा अभ्यास पूर्ण होईल. त्यासाठी नव्याने पूर्वपरीक्षेच्या पेपर १ साठी खूप जास्त अभ्यास करावा लागणार नाही.
संघ लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर (www. Upsc.gov.in) जर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला तर त्यात एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे, तो असा की, पेपर २ ते ५ याचे स्वरूप असे असेल की, एखादा सुशिक्षित माणूस कोणत्याही विशेष ज्ञानाशिवाय (without any specialized study)  ही परीक्षा देऊ शकेल. यातील प्रश्नाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवांशी संबंधित विषयाचे सामान्य आकलन तपासले जाते. याद्वारे विद्यार्थ्यांचे संबंधित विषयांचे मूलभूत ज्ञान तसेच परस्परविरोधी सामाजिक व आíथक उद्दिष्ट, मागण्या यांचे विश्लेषण करून मत बनविण्याची क्षमता याची चाचणी होते.
२०१३ च्या मुख्य परीक्षेपासून ऐच्छिक विषय एकच असणार आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार दोन ऐच्छिक विषय निवडावे लागत.
पेपर ६ व ७ जो ऐच्छिक विषयाशी संबंधित आहे, त्याचा आवाका ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाएवढा असेल जो पदवीपेक्षा जास्त पण पदव्युत्तर अभ्यासक्रमापेक्षा कमी असेल. मात्र अभियांत्रिकी कायदा, वैद्यकीय शास्त्रांचा अभ्यासक्रम पदवी दर्जाचाच असेल. विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेत कसे उत्तर लिहावे यासंबंधी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ओळ या अभ्यासक्रमात नमूद केली आहे. ती म्हणजे विद्यार्थ्यांनी सुसंगत, अर्थपूर्ण आणि संक्षिप्त उत्तर लिहावे. नवीन अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे -
अ) आठव्या परिशिष्टामधील कोणतीही एक भारतीय भाषा - ३०० गुण.
ब) इंग्रजी - ३००  गुण.
वरील दोन्ही पेपर्समधील गुण एकूण गुणांमध्ये ग्राह्य़ धरले जात नाहीत. मात्र वरील दोन्ही पेपर पास होणे आवश्यक असते, जर विद्यार्थी वरील पेपरमध्ये नापास झाला तर त्याचे पुढचे पेपर तपासले जात नाहीत, एकूण गुणांत ग्राह्य़ धरले जाणारे पेपर पुढीलप्रमाणे :
पेपर १ निबंध :  ( गुण २५०) :- विद्यार्थ्यांना एका विशिष्ट विषयावर निबंध लिहावा लागतो. निबंधाच्या विषयाचे पर्याय उपलब्ध असतात. निबंध विषयाशी सुसंगत, स्पष्टपणे लिहिणे अपेक्षित आहे. अभ्यासक्रमात असे नमुद करण्यात आले आहे की थेट व परिणामकारक अभिव्यक्तीस गुण दिले जातील. निबंधाचा हा पेपर मराठी भाषेतूनदेखील लिहिता येईल.
पेपर २ सामान्य अध्ययन : १ (गुण २५०) :- भारतीय संस्कृती व वारसा, जग व समाजाचा इतिहास आणि भूगोल.
पेपर ३ सामान्य अध्ययन :  २ (गुण २५० ) :- शासनयंत्रणा संविधान, प्रशासन, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध.
पेपर ४ सामान्य अध्ययन : ३ (गुण २५०) :- तंत्रज्ञान, íथक विकास, जैवविविधता, पर्यावरण सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन.
पेपर ५ सामान्य अध्ययन : ४ ( गुण २५० ) :- नीतिमूल्य, एकात्मता व प्रवृत्ती.
पेपर ६ व ७ वैकल्पिक विषयासंदर्भात : विद्यार्थी हा अधिसूचनेत नमूद केलेल्या विषयांपकी कोणताही एक विषय घेऊ शकतो. त्याचे दोन पेपर असतील व प्रत्येक २५० गुणांचा असेल. म्हणजे वैकल्पिक विषय आता इंग्रजी किंवा मराठी लिहिता येईल. भाषा साहित्याबाबत जी अट सुरुवातीला आयोगाने टाकली होती, ती आता रद्द करण्यात आली आहे, नवीन अधिसूचनेनुसार आता कोणत्याही शाखेतील विद्यार्थी ऐच्छिक विषय म्हणून भाषा साहित्य घेऊ शकतो.
लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीसाठी  २७५ गुण आहेत.
संघ लोकसेवा आयोगाच्या अधिसूचनेनुसार असे लक्षात येते की, नवीन बदललेल्या अभ्यासक्रमात ऐच्छिक विषयाचे महत्त्व थोडे कमी केले आहे. कारण जुन्या अभ्यासक्रमानुसार दोन ऐच्छिक विषय घ्यावे लागत. त्याला प्रत्येकी ६०० गुण होते. म्हणजे २३०० गुणांपकी १२०० गुण फक्त ऐच्छिक विषयांना होते. अगदीच टक्केवारीच्या भाषेत बोलायचे झाल्यास ५२ टक्के गुण ऐच्छिक विषयांना होते. नवीन अभ्यासक्रमानुसार, वैकल्पिक विषयांना फक्त ५०० गुण असतील म्हणजे २४ टक्के गुण विषयाला आहेत.
याउलट जुन्या अभ्यासक्रमानुसार सामान्य अध्ययनासाठी ६०० गुण होते. आता सामान्य अध्ययनाची व्याप्ती वाढून त्याचे चार पेपर करण्यात आले असून त्यासाठी १००० गुण असतील. अगदीच टक्केवारीनुसार बोलायचे झाल्यास जुन्या  अभ्यासक्रमानुसार २६ टक्के गुण सामान्य अध्ययनाला होते, तर नवीन अभ्यासक्रमानुसार त्याची व्याप्ती २६ टक्क्य़ांवरून ४६ टक्क्य़ांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
 मुख्य परीक्षेची तयारी कशी कराल ?
पूर्व परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते, तर मुख्य परीक्षा दीघरेत्तरी स्वरूपाची असते. जे विद्यार्थी २०१४ च्या परीक्षेसाठी तयारी करीत असतील त्यांनी मुख्य परीक्षेची रणनीती वेगळी ठेवावी. कारण त्यांच्या तयारीसाठी बराच अवधी त्यांच्या हाताशी आहे. अशा विद्यार्थानी सर्वप्रथम एन.सी.आर.टी.ची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके वाचून काढावीत. शक्यतो त्यांच्या नोट्स तयार कराव्यात. या  पुस्तकात काही संकल्पना अंत्यत सोप्या भाषेत दिल्या असल्याने, एखाद्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना मुद्देसूद आणि प्रभावीपणे लिहिता येते. नवीन अभ्यासक्रम जर बारकाईने अभ्यासला तर सामान्य अध्ययानाचा पेपर चालू घडामोडीशी संबंधित आहे, म्हणजे आपल्या अवतीभोवती काय घडत आहेत्याचा आपल्या देशाच्या राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणावर कसा प्रभाव पडतो, याचा बारकाईने अभ्यास करावा. त्यासाठी रोजच्या रोज कमीत कमी दोन दैनिकांचे वाचन करावे, त्यांची टिपणे काढावीत. यांचा सर्वात जास्त फायदा मुख्य परीक्षेसाठी होतो. टी.व्ही.वर दिवसातून एकतरी कार्यक्रम देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडले, यासंबंधी चर्चासत्रांचा असतो. त्या विषयाशी संबंधित तज्ज्ञांमार्फत घटनेचा ऊहापोह होत असतो. असे कार्यक्रम अवश्य पाहावेत. शक्य झाल्यास अशा कार्यक्रमांचे रेकॉìडग करून ठेवावे. ते शक्य नसेल तर काही मुद्दे कार्यक्रम पाहताना लिहून ठेवावेत. त्यावर परीक्षेत कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, याचा विचार करून असा प्रश्न आल्यास आपण कसे उत्तर लिहू शकतो, हे प्रत्यक्ष लिहून पाहावे. असे केल्यास सामान्य अध्ययनात प्रश्न कसाही विचारला गेल्यास त्याचे मुद्देसूद उत्तर लिहिण्यास विद्यार्थ्यांना शक्य होते. अनेक विद्यार्थ्यांची एक चूक होते ती म्हणजे मुख्य परीक्षेला त्यांचा अभ्यास  चांगला असतो, परंतु प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत याचा सराव न केल्याने त्यांना मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळत नाहीत. 
गेल्या चार ते पाच वर्षांच्या मुख्य परीक्षेच्या पेपरचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, आयोग आजकाल प्रश्न थेट विचारले जात नाहीत. म्हणून केवळ ठराविक पुस्तक किंवा कोचिंग क्लासच्या नोट्सचे पाठांतर करून या परीक्षेत यश मिळवता येत नाही. पुस्तके किंवा नोट्स तुम्हाला त्या विषयासंदर्भातील माहिती देऊ शकतात, मात्र उत्तर तुम्हाला परीक्षेच्या काळात स्वत:च तयार करावयाचे असते. यासाठी सराव केला नसेल तर प्रचंड नुकसान होते.
उदा. भारत व पाकिस्तान संबंधांची चर्चा करा, अशा थेट प्रश्नाऐवजी 'नुकत्याच पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीत नवाज शरीफ जिंकून आलेत. त्यांच्या निवडीमुळे भारत-पाकिस्तान संबंधांवर कसा परिणाम होईल, याचे टीकात्मक परीक्षण करा-' असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणूनच प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा सराव असेल व अशी उत्तरे तज्ज्ञ प्राध्यापकांकडून किंवा त्याविषयाशी संबंधित तज्ज्ञ व्यक्तीकडून तपासून घेतली असतील तर विद्यार्थ्यांना अचूक उत्तर कसे लिहावे हे समजू शकते आणि परीक्षेत प्रश्न कसाही विचारला गेला तरी मुद्देसूद उत्तरे लिहता येतात. रोजचे टिपण, त्यासंबंधित आपण तयार केलेली प्रश्नोत्तरे यासाठी स्वतंत्र वही करावी व त्यांचे वाचन वेळोवेळी करावे. 
जे विद्यार्थी २०१३ मध्ये मुख्य परीक्षा देणार आहेत, त्यांनी अभ्यासाची स्वतंत्र रणनीती तयार करावी. मुख्य परीक्षेला सुमारे सात महिन्यांचा अवधी आहे. जर आजपासूनच अभ्यासाला सुरुवात केली तर हा कालावधी वैकल्पिक विषयाची तयारी व सामान्य अध्ययनाची तयारी यासाठी पुरेसा आहे. मात्र हा कालावधी विद्यार्थी कसा वापरतात, यावर बरेच काही अवलंबून राहील. नवीन अभ्यासक्रमानुसार, सामान्य अध्ययनाच्या चार पेपरसाठी विशेष अध्ययन सामग्री लगेच उपलब्ध होणार नाही.
मात्र, बदललेला अभ्यासक्रम जुन्या अभ्यासक्रमापेक्षा अगदी वेगळा आहे, असे नाही. तयारी करताना अभ्यासक्रमात दिलेला प्रत्येक मुद्दा व्यवस्थितपणे अभ्यासावा. जर काही मुद्दे पुस्तकात आपणास सापडत नसतील तर इंटरनेटचा वापर करावा. जास्तीत जास्त लिहिण्याचा सराव करावा. मागच्या १० वर्षांच्या प्रश्नपत्रिकेत कोणते प्रश्न कसे विचारले गेले आहेत, याचा आढावा घ्यावा. त्यातील काही प्रश्न जे नवीन अभ्यासक्रमाशी संबंधित आहेत, ते शब्दमर्यादा पाळून लिहून पाहावेत आणि तज्ज्ञांकडून ते तपासून घ्यावेत. लिहिण्याचा आपण जेवढा जास्त सराव कराल तेवढे आपणास फायदेशीर असेल. 
सामान्य अध्ययनाच्या अभ्यासासाठी संदर्भ पुस्तके -
भारतीय संस्कृतीचा वारसा यासाठी स्पेक्ट्रम प्रकाशन, भारतीय इतिहासासाठी बिपीन चंद्रा, ग्रोव्हर आणि ग्रोव्हर, भूगोलासाठी सिवदर सिंग, भारतीय भूगोलासाठी, माजिद हुसेन, अर्थशास्त्रासाठी २०१३ केंद्र सरकारची आíथक पाहणी दत्त आणि सुंदरम किंवा उमा कपिला यांचे पुस्तक, विज्ञान व तंत्रज्ञानासाठी विझार्ड प्रकाशनाचे किंवा टी.एम.एच. प्रकाशनाचे पुस्तक त्याचप्रमाणे 'इंडिया इयर बुक २०१३' मधील विज्ञान तंत्रज्ञानाचा भाग, तसेच मागच्या काही महिन्यांतील व परीक्षेपर्यंत 'सायन्स रिपोर्टर' या मासिकातील अभ्यासाशी संबंधित लेख, सामान्य अध्ययन पेपर-२, शासनयंत्रणा, संविधान प्रशासन यासाठी लक्ष्मीकांत यांचे पुस्तक या पुस्तकांच्या अभ्यासाबरोबरच इग्नू (कॅठडव) यांची अभ्यासक्रमाशी संलग्न साहित्य याचा उपयोग करावा. पेपर मराठीमध्ये लिहिणार असाल तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची अभ्यासक्रमाशी संलग्न अशी पुस्तके यांचा वापर करावा. 
सामान्य अध्ययनात, मुख्य परीक्षेसाठी प्रश्न २ मार्क्‍स, ३ मार्क्‍स, ५ मार्क्‍स, १० मार्क्‍स, १५ मार्क्‍स तसेच २० मार्क्‍स यासाठीही विचारले जातात. प्रत्येक प्रश्नांना विशिष्ट शब्दमर्यादा दिलेली असते. शक्यतो शब्दमर्यादेतच उत्तर लिहावे. उत्तर संक्षिप्त व मुद्देसूद असावे. प्रश्न व्यवस्थित समजून उत्तर लिहावे, म्हणजे चुका होण्याची शक्यता कमी असते. कमी शब्दात अर्थपूर्ण सुसंगत व मुद्देसूद उत्तर लिहिण्याची सवय आत्तापासूनच करावी. 
आयोगाने आपल्या वेबसाइटवर जो अभ्यासक्रम दिलेला आहे, त्यात सामान्य अध्ययनासाठी खालील उपघटकांचा समावेश होतो.
सामान्य अध्ययन पेपर १ : 
०यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत कला, साहित्य व स्थापत्य यांची वैशिष्टय़े.
०यामध्ये १८ व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंत आधुनिक भारताचा इतिहास, त्यातील महत्त्वाच्या घटना, व्यक्ती, महत्त्व आणि समस्या. 
०भारताचा स्वांतत्र्यलढा, त्यातील महत्त्वाचे टप्पे, देशाच्या विविध भागांतून व विविध व्यक्तींनी दिलेले योगदान. 
०स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दृढीकरण व देशांतर्गत पुनर्रचना. 
०१८ व्या शतकापासून जगाचा इतिहास, औद्योगिक क्रांती, महायुद्ध, राष्ट्रीय सीमांची पुनर्रचना, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, समाजवाद, साम्राज्यवाद, भांडवलवाद, त्यांचे प्रकार आणि त्यांचा समाजावरील परिणाम.
०भारतीय समाजाची ठळक वैशिष्टय़े व भारतातील वैविधता. 
०महिला आणि महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या व संबंधित समस्या, दारिद्रय़ आणि विकासाच्या समस्या, नागरीकरण ,त्यांच्या समस्या व उपाय. 
०जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम. 
०सामाजिक शक्तीकरण, धर्मातरता, प्रादेशिक वाद व धर्मनिरपेक्षता. 
०जगाच्या प्राकृतिक भूगोलाचे वैशिष्टय़. 
०महत्त्वाच्या नसíगक साधनसंपत्तीचे जगातील वितरण (दक्षिण आशिया व भारतीय उपखंड यांना मिळून) प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र यासंबंधित औद्योगिक विकास हा जगातील विभिन्न भागात कसा झाला, यासंबंधीची कारणे (भारतासह.) 
०महत्त्वाच्या भौगोलिक समस्या उदा. भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळे इ. महत्त्वाची प्राकृतिक वैशिष्टय़े, त्यांचे स्थान व त्यांच्यातील बदल, जलस्थान व हिमनग, जैवसृष्टी व बदल हा अभ्यासक्रम सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये नमूद केलेला आहे.
कुठल्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी सरावाची अत्यंत आवश्यकता असते. जेते खेळाडू किंवा यशस्वी व्यक्तींच्या आयुष्याकडे पाहिल्यास त्यांनी केलेला सराव आणि सरावात ठेवलेले सातत्य यांमुळे त्यांना यश मिळाल्याचे आपणास दिसते. हा नियम संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठीदेखील लागू होतो. 
मुख्य परीक्षेत जास्तीत जास्त गुणांनी यश मिळविण्यासाठी मुद्देसूद लिहिण्याचा सराव, सातत्यपूर्ण करावा हे सूत्र आहे, हे लक्षात असू द्या! 

1 comment:

तुमचे प्रश्न व अभिप्राय येथे लिहा